सोनू सूद साडेपाच हजार रुपये घेऊन आला होता मुंबईत, आज ठरतोय अनेकांसाठी ‘देवदूत’

Sonu Sood


बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची मोहिम हाती घेतली आहे. “शेवटचा स्थलांतरित मजूर घरी पोहचेपर्यंत मी ही घर भेजो मोहीम सुरु ठेवणार आहे,” असं सांगणारा सोनू सध्या बराच चर्चेत आहे. सोनूने परराज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची ‘घर भेजो’ मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत त्याने हजारो मुजरांना आपल्या राज्यामध्ये परत पाठवलं आहे.

सोनूने केलेल्या मदतीची जाण ठेवत घरी सुखरुप पोहचलेल्या अनेक मजुरांनी त्याचे आभार मानले आहेत. सोनू कामगारांना बसने घरी पाठवण्याबरोबरच ते घरी पोहोचेपर्यंत त्यांच्या जेवणाचा खर्चही उचलला आहे. मात्र खूपच कमी लोकांना ठाऊ आहे की सोनू अवघे साडेपाच हजार रुपये घेऊन स्वप्न नगरी मुंबईत दाखल झाला होता. चला तर जाणून घेऊयात सोनूबद्दलच्या काही खास गोष्टी...

सोनू सूदचा जन्म ३० जुलै १९७३ रोजी पंजाबमधील मोगा येथे झाला. मात्र उच्च शिक्षणासाठी तो नागपूरमध्ये आला. येथील यशवंतराव चव्हाण इंजिनियरिंग कॉलेजमधून याने शिक्षण पूर्ण केले. याच काळात तो मॉडलिंग करु लागला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मॉडलिंगसाठी दिल्लीला गेला. 

दिल्लीमध्ये असतानाच मॉडेलिंग क्षेत्रात आपण काम करण्यास सुरुवात केली, असं सोनूने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. थोडे पैसे कमवून आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत येण्यासंदर्भात सोनूने आधीच ठरवलं होतं. 

दिल्लीमध्ये एक दीड वर्षे मॉडेलिंग केल्यानंतर सोनूकडे साडेपाच हजार रुपये जमा झाले. एवढ्या पैशांच्या जोरावर आपण मुंबईत एक महिना सहज काढू शकतो असं सोनूला वाटलं आणि तो थेट मुंबईमध्ये दाखल झाला.

सोनूने वर्ष दीड वर्षात जमवलेले पाच हजार रुपये मुंबईत आल्यानंतर अवघ्या पाच सहा दिवसांमध्ये संपले. त्यामुळे आता मुंबईत टिकायचं म्हणजे घरच्यांची मदत घ्यावी लागणार असा विचार करत असतानाच सोनूबरोबर असं काही झालं की त्याचा त्याने विचारही केला नव्हता.


एका जाहिरातीसाठी सोनूला विचारण्यात आलं. सोनूनेही त्याला तात्काळ होकार दिला आणि जाहिरातीच्या माध्यमातून का होईना त्याचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाचा श्रीगणेशा झाला. या जाहिरातीच्या शूट दरम्यान त्याला दिवसाला दोन हजार रुपये दिले जायचे. ही जाहिरात केल्यानंतर लोकं मला ओळखू लागतील असं मला वाटलेलं, असंही सोनूने या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. 

मात्र सोनू जेव्हा प्रत्यक्ष जाहिरातीच्या शूटींगसाठी गेला तेव्हा तिथे त्याच्यासारखेच आणखीन १० ते २० जणं होतं. मुख्य म्हणजे सोनूला जाहिरातीमध्ये पाठीमागे ड्रम वाजवण्याची भूमिका होती. जाहिरात शूट झाल्यानंतर सोनूला स्वत:लाच शोधायला कष्ट पडले तर इतरांनी त्याची दखल घेणं दूरचं होतं.

सोनूने नंतर अपोलो टायर्स आणि एअरटेलच्या जाहिरातीमध्ये काम केलं.

सोनू जेव्हा मुंबईमध्ये आला तेव्हा तो इतरांच्या मदतीने काम शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी कोणताही कलाकार त्याला भेटण्यास नकार देत होता आणि भेटले एखादा चुकून भेटलाच तर तो चित्रपटसृष्टीमध्ये कसा संघर्ष आहे वगैरे सांगून त्याचा उत्साह कमी करण्याचे काम करायचा. 

'तू हिरो बननण्यासाठी आला असशील तर परत जा कारण तुला हे जमेल असं वाटत नाही’, असं मला काही जणांनी सांगितल्याचंही सोनूने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं. मात्र आपण कधीच हार मानली नाही किंवा दुसऱ्यांनी सांगितलेल्या नकारात्मक गोष्टींवर विश्वास ठेवला नाही आणि स्वत:चा आत्मविश्वास कायम ठेवल्याचे सोनू म्हणतो.

१९९९ मध्ये त्याने ‘कल्लाझागर’ आणि ‘नीनजीनील’ या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर तो २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘हॅण्डस अप’ चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिकेमध्ये दिसला. २००१ साली त्याने ‘मजनू’ या चित्रपटामध्ये काम केलं.

त्यानंतर हळूहळू सोनू हिंदी चित्रपटांमध्ये दिसू लागला. २००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘शहीद-ए-आझम’ चित्रपटात त्याने क्रांतीकारी भगत सिंग यांची भूमिका साकारली. त्यानंतर त्याने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. 

मणी रत्नम यांच्या २००४ साली प्रदर्शित झालेल्या युवा चित्रपटामध्ये सोनूने अभिषेक बच्चनच्या भावाची भूमिका साकारली होती. त्यानंतर २००५ साली आशिक बनाया आपने चित्रपटामध्ये सोनू झळकला. या दोन चित्रपटांमुळे खऱ्या अर्थाने लोकं सोनूला ओळखू लागले.

२००५ साली आलेल्या सुपर या टॉलिवूडमधील चित्रपटामुळे दक्षिण सोनू तुफान लोकप्रिय झाला. या चित्रपटामध्ये त्याना नागार्जुनबरोबर सहकलाकाराची भूमिका साकारली होती. सोनूने जोधा अकबरमध्ये साकारलेली भूमिकाही चांगलीच गाजली होती.

२०१० साली सोनूने दबंग चित्रपटामध्ये मुख्य गुंडांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला त्या वर्षीचा सर्वोत्तम नकारात्कम भूमिका हा पुरस्कार आयफाने दिला होता.

‘शूट आऊट अट लोखंडवाला’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘कुंग फू योगा’ आणि ‘सिम्बा’सारख्या चित्रपटांमधून सोनू देशातील घराघरामध्ये ओळखीचा चेहरा झाला. 

याच सोनूचे आत देशभरातून कौतुक होताना दिसत आहे. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी सोनूने ‘घर भेजो’ मोहीम सुरु केली आहे. यासाठी अगदी बॉलिवूड अभिनेत्यांपासून ते क्रिकेटपटू, राजकारणी आणि महाराष्ट्राच्या राज्यापालांनीही सोनूचं कौतुक केलं आहे. 

सोनू मागील काही आठवड्यांपासून स्थलांतरित मजुरांना घरी जाण्यासाठी बसची व्यवस्था करत आहे. सोनू आणि त्याची टीम अनेकदा स्वत: या मजुरांना निरोप देण्यासाठी उपस्थित राहिल्याचे पहायला मिळालं आहे. एका कॉल सेंटरच्या मदतीने सोनू आणि त्याच्या टीमने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला असून व्हॉट्सअप आणि ट्विटरच्या माध्यमातून ते स्थलांतरितांना मदत करत आहेत.

“स्थलांतरितांबद्दल चौकशी करण्यासाठी रोज मला फोन येतात आणि आज किती लोकांना पाठवणार आहात असं विचारलं जातं. मला दिवसाला देशभरातून ५६ हजारहून अधिक मेसेज येत आहेत,” असं सोनू सांगतो. हे काम आव्हानात्मक असलं तरी ते करताना छान वाटत आहे असं सोनूने सांगितलं. दिवसातील १८ तास सोनू स्थलांतरितांना त्यांच्या मूळ राज्यात पाठवण्यासंदर्भातील सन्मवय करण्याचे, प्रत्यक्ष बसची व्यवस्था पहायला जाण्याचे काम करण्यात व्यस्त असतो. 

बसची व्यवस्था करण्याबरोबरच सोनू सूदने पंजाबमधील डॉक्टरांसाठी १५०० पीपीई किटही पाठवले आहेत. इतकंच नाही तर सोनू सूदने ठाण्यातील कळवा येथे मजुरांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. सोनू सूदने मदतीसाठी ट्रक पाठवले होते.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.